प्रवास गुडघे बदलल्यानंतरचा…

“संधिवातामुळे होणाऱ्या गुडघेदुखी वरचा उपाय म्हणजे गुडघे बदलणे” हेच आपल्याला माहित असते! म्हणूनच ही शस्त्रक्रिया सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर होणारी शश्त्रक्रिया आहे. ९०-९५% शश्त्राक्रिया यशस्वी होतात व लोकांना गुद्घेदुखीपासून मुक्ती मिळते!

शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणजे गुडघ्याचा सर्व तक्रारी थांबल्या असे होते का? यशस्वी शस्त्रक्रियेनंतर लगेच मला सर्व काही करता येऊ शकते का?

शस्त्रक्रियेचे खरे यश म्हणजेच गुडघे न दुखता हवे असलेले काम करता येणे यातच आहे. ही पायरी गाठण्याकरिता एकमेव उपाय म्हणजे फिजिओथेरपी!!

शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला सर्वाधिक गरज एका तज्ञ फिजिओथेरपिस्ट ची असते…. गुडघे बदलले तरी आजूबाजूचे स्नायू जुनेच असतात. कमकुवत स्नायू तुमचा नवीन सांध्यांना साथ देऊ शकत नाहीत व त्यामुळे शस्त्रक्रिया छान झाली तरी, ‘अजून नीट चालता येत नाही, जिने चढणे अवघड जाते’ अशा तक्रारी चालू राहतात….

हे होऊ नये यासाठी थोडे शस्त्रक्रियेनंतरचा फिजिओथेरपी विषयी जाणून घेऊया…

कशी असते शस्त्रक्रियेनंतरची फिजिओथेरपी?

      शस्त्रक्रियेनंतर पहिल्याच दिवशी फिजिओथेरपिस्ट तुम्हाला उभे करतात व गुडघ्याचे काही अगदी सोपे व्यायाम सांगतात. या शस्त्रक्रियेनंतर साधारण ४-५ दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागते. या दरम्यान गुडघ्याचे स्नायू बळकट करण्याचे व्यायाम सुरु केले जातात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे- आपापले उठून बसणे, walker धरून उभे राहणे व चालणे याचा सराव करून घेतला जातो. पायऱ्या चढण्या-उतरण्याचा देखील सराव होतो. या हालचाली करत राहिल्यामुळे; रक्ताचा गाठी होणे या सारखे शस्त्रक्रियेनंतर होणारे त्रास टाळता येतात.

या नंतर साधारण पुढचा महिनाभर फिजिओथेरपी करणे अनिवार्य आहे. घरच्या-घरी हे व्यायाम घेतले जातात.       शस्त्रक्रियेनंतर दुखणे कमी करणे, टाक्यांची काळजी घेणे हे ही महत्त्वाचे भाग आहेत. Walker सोडून नीट चालता येणे हे या टप्प्याचे मुख्य ध्येय असते.

आपापले चालता-फिरता येऊ लागले व बरीच कामे स्वतः करता येऊ लागली की फिजिओथेरपी थांबवली जाते. ‘रोज चालायला जातो आता वेगळा व्यायाम लागणार नाही’, डॉक्टरांनी आता फिजिओथेरपी थांबवली तरी चालेल असे सांगितले आहे’ या सारख्या कारणांमुळे फिजिओथेरपी मध्ये खंड पडतो तो कायमचाच.

या टप्प्यात व्यायाम थांबवला तरी थोडे दिवस सर्व सुरळीत चालते. जशी कामे, फिरणे इत्यादी वाढू लागते तसे मात्र पुन्हा छोटी-मोठी दुखणी, स्नायू भरून येणे, गुडघे आखडणे इत्यादी जाणवायला लागते.

यावर एकमेव उपाय म्हणजे फिजिओथेरपिस्ट नी सांगितल्या नुसार फिजिओथेरपी उपचार पूर्ण करणे. फिजिओथेरपी उपचार पहिल्या टप्प्यात फक्त दैनंदिन हालचाली नीट जमाव्यात इतपतच व्यायाम घेतला जातो पण तेवढेच पुरेसे नसते…..

सर्व कामे नीट करता यावीत यासाठी खालील सर्व गोष्टी गरजेच्या आहेत-

१. गुडघ्यांची लवचिकता- शस्त्रक्रियेनंतर गुडघा पूर्ण वाकवता व सरळ करता आला पाहिजे. खुर्चीवर बसणे, चालणे, जिने चढणे-उतरणे या सगळ्यात गुडघ्यांची पूर्ण हालचाल गरजेची आहे. शस्त्रक्रियेनंतर २-३ महिन्यात ही पूर्ण हालचाल जमणे अपेक्षित आहे.

त्यानंतर पुन्हा ती कमी होऊ नये यासाठी पायांचा स्नायूंची लवचिकता वाढवणारे व्यायाम करावे. रोज चालायला जात असाल तर त्यानंतर हे व्यायाम केल्यास अधिक उपयुक्त ठरते.

२. बळकट स्नायू- शस्त्रक्रियेनंतर स्नायूंची ताकद वाढवणे सर्वात महत्त्वाचे असते. सुरवातीला फार काही जमत नसल्यामुळे झोपून व बसूनच हे व्यायाम करावे लागतात. साधारण महिन्याभरात तुमचे फिजिओथेरपिस्ट हे व्यायाम वजन लावून किंवा Theraband लावून करायला सांगतात. यानी ताकद पटकन वाढते.

शस्त्रक्रियेनंतर निदान ३-४ महिने हे व्यायाम सुरु ठेवावेत. आधी फक्त झोपून करण्याचे व्यायाम नंतर उभे राहून केले जातात. पायांचे मुख्य काम उभे राहणे व चालणे असल्यामुळे हे व्यायाम अत्यंत गरजेचे आहेत.

३. चालण्याची क्षमता वाढवणे- गुडघे बदलण्यामागचे मुख्य उदिष्ट हेच असते. सुरवातीला walker धरून चालणे व त्यानंतर सुटे चालणे हा प्रवास अगदी सहज असतो. मात्र त्यानंतर रस्त्यावर गर्दीत चालणे, ओबडधोबड रस्त्यांवर चालणे, अतिउंच पायऱ्या चढणे, कधी वाळूत/मातीत चालणे; यात खरा कस लागतो व त्यासाठीच या सगळ्याचे प्रशिक्षण फिजिओथेअपिस्ट कडून करून घेणे गरजेचे आहे.

शस्त्रक्रियेनंतर जी सर्वसाधारण फिजिओथेरपी घेतली जाते त्यात हे सगळे शिकवणे शक्य नसते. पण, चालण्याचे व तोल सांभाळण्याचे विविध व्यायाम साधारण शस्त्रक्रियेनंतर २-४ महिने केल्यास वरील गोष्टी सोप्या होतात, सवयीचा होतात. नंतर रोज चालणे, जॉगिंग इत्यादि व्यायाम चालू ठेवावे.

४. तोल सांभाळण्याची क्षमता वाढवणे- बऱ्याच जणांनी replacement पूर्वी वर्षानुवर्षे पायाचे दुखणे सहन केलेले असते, बऱ्याच जणांना पायाला बाक असतो व बऱ्याच जणांनी चालणे बंद केलेले असते. या मुळे थोड्याफार प्रमाणात सगळ्यांचाच balance कमी असतो. पायऱ्यांवर, भरभर किंवा गर्दीत चालताना तोल जाऊ शकतो. या करिता balance चे व्यायाम करणे गरजेचे आहे. यानी तुमचा चालण्यातला confidence देखील छान वाढतो.

काही मोजक्या शस्त्रक्रियांमध्ये पायाला बाक राहणे, दुसऱ्या स्नायूंना/नसांना इजा होणे या सारख्या गुंतागुंती होऊ शकतात. याची शक्यता अगदीच दुर्मिळ असते, पण असे झाल्यास या रुग्णांना फिजिओथेरपी वर जास्त भर द्यावा लागतो. बरे व्हायला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो. तसेच, वयोवृद्ध रुग्णांना देखील अगदी हळू-हळू  हे सर्व करायला शिकवावे लागते. सुटे चालायला बाकीच्यांपेक्षा जास्त वेळ यांना लागू शकतो. अशावेळी सहाजिकपणे, ‘सर्जरी फसली तर नाही ना’, या सारख्या शंका-कुशंका येऊ लागतात. फिजिओथेरपिस्ट आणि आपण मिळून थोडे जास्त कष्ट घेतल्यास हाही टप्पा पार करता येतो….

   थोडक्यात, सर्जन चे काम एकदा झाले, की तुम्हाला स्वतःला पूर्णपणे फिजिओथेरपिस्ट चा हाती सोपवून द्यावे लागते. अगदी एक-एक पाउल टाकण्यापासून तुम्हाला मॉर्निंग वॉक ला पाठवण्यापर्यंत हीच मंडळी तुमच्याबरोबर असतात. ‘मला आपापले उठता येईल का’, ते ‘आता युरोप ट्रीप ला जातोय तिथे छान फिरता येईल ना?’ परंत सर्व शंकांचे निरसन तुमचा फिजिओथेरपिस्टच करतो! त्यामुळे तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टला भेट द्याआणि या सगळ्या शंकांवर आणि त्रासांवर रामबाण उपाय मिळवा.

-डॉ. श्रिया जोशी

Contact us

Fill out the form below, and we will be in touch shortly.